लातूर प्रतिनिधी: Latur Crime News | शेतकऱ्यांच्या कष्टाच्या धंद्यावर आणि गोधनावर डल्ला मारणाऱ्या एका कुख्यात आंतरराज्यीय जनावरे चोरट्यांच्या टोळीला लातूर जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. या थरारक कारवाईत परभणी जिल्ह्यातील ३ आरोपींना अटक करण्यात आली असून, हरियाणाच्या सराईत गुन्हेगारांच्या साथीने त्यांनी लातूरसह ५ जिल्ह्यांत केलेल्या तब्बल ४१ जनावरे चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात लातूर पोलिसांना मोठे यश आले आहे. आरोपींकडून जनावरांच्या मांस विक्रीतून गोळा केलेली २४ लाख ६८ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.
अशी झाली कारवाई: थरारक सापळा आणि पाठलाग
लातूर जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या जनावरे चोरीच्या घटनांमुळे शेतकरी वर्ग त्रस्त झाला होता. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष चक्रे हालवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात एक विशेष पथक तयार करण्यात आले होते.
दिनांक ०६ ऑगस्ट २०२६ रोजी पोलिसांना खात्रीशीर गुप्त माहिती मिळाली की, किनगाव ते पिंपळखेड रस्त्यावरील शिरसाठवाडी फाटा परिसरात काही सराईत गुन्हेगार जनावरे चोरीच्या गुन्ह्यांच्या आपापसातल्या व्यवहारासाठी जमले आहेत. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिसराला चोहोबाजूंनी वेढा घातला. पोलिसांना पाहताच आरोपींनी पिकअप वाहनावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी अत्यंत धाडसी पाठलाग करत ३ जणांच्या आवडी आवळल्या.
जेरबंद केलेले आणि पसार झालेले आरोपी

पोलिसांनी शिताफीने पकडलेले आरोपी: १. अतिक सुलतान कुरेशी (रा. गंगाखेड, जि. परभणी) २. मुजाहिद बाबू खाटीक (रा. परभणी) ३. साजू गफार कुरेशी (रा. पालम, जि. परभणी)
तसेच त्यांचे हरियाणा राज्यातील साथीदार नियाज उर्फ महंमद नवाब आणि आस मोहम्मद सिरदार यांच्यासह इतर चार जण पसार झाले असून, पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
४१ गुन्ह्यांची कुख्यात कुंडली उघडी!
सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपींसमोर पोलिसांनी जेव्हा तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीचा बडगा उगारला, तेव्हा त्यांनी चोऱ्यांची कबुली दिली.
- कसे करायचे कृत्य? आरोपी लातूरसह बीड, जालना, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमधून बैल, गायी, म्हशी आणि वासरे चोरत असत. त्यानंतर त्यांची कत्तल करून मांस विक्रीतून लाखो रुपयांची काळाबाजार कमाई करत होते.
- कशात किती गुन्हे उघड? या एकाच कारवाईमुळे लातूर जिल्ह्यातील २४ गुन्हे (रेणापूर, जळकोट, लातूर ग्रामीण, उदगीर ग्रामीण, चाकूर, किनगाव, अहमदपूर, औसा, कारार शिरसी पोलीस ठाण्यांमधील) उघडकीस आले आहेत. याशिवाय बीड, जालना, नांदेड व हिंगोली जिल्ह्यांतील १७ गुन्हे देखील उघड झाले असून संबंधित पोलीस ठाण्यांना याची माहिती देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा
जनावरे चोरीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या आणि रात्रीचा डोळा मोडून पहारे देणाऱ्या जिल्ह्यातील बळीराजासाठी ही कारवाई एक मोठा दिलासा ठरली आहे. लातूर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर, सपोनि पांडुरंग माने, पोउपनि राजेश घाडगे, अमर केंद्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत धाडस आणि कौशल्याने पार पाडली आहे.

