महापौरांच्या 'त्या' निर्णयाने गुत्तेदारांच्या पोटात गोळा! भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; लातूर महानगरपालिकेत राजकीय रणकंदनमहापौरांच्या 'त्या' निर्णयाने गुत्तेदारांच्या पोटात गोळा! भाजप-काँग्रेसमध्ये जुंपली; लातूर महानगरपालिकेत राजकीय रणकंदन

लातूर (प्रतिनिधी): लातूर महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या ‘टक्केवारी’ आणि ‘स्थगिती’ या दोन शब्दांनी चांगलेच वादळ निर्माण केले आहे. मनपाच्या मंजूर कामांना नवनिर्वाचित महापौरांनी स्थगिती दिल्यामुळे भाजपने काँग्रेसवर टक्केवारीचा आरोप केला होता. मात्र, काँग्रेसने पत्रकार परिषद घेत भाजपचा हा तीर त्यांच्यावरच उलटवला असून, “टक्केवारी कुणाला लागते, हे संपूर्ण जिल्ह्याला चांगलेच ठाऊक आहे,” असे सडेतोड उत्तर दिले आहे.

लातूर महानगरपालिकेची सत्ता स्थापन झाल्यानंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत मोठा गदारोळ झाला. मागील काळात महापालिकेच्या अनेक निविदा निघाल्या होत्या आणि त्यांचे ‘वर्क ऑर्डर’ देखील देण्यात आले होते. मात्र, हे वर्क ऑर्डर नियमबाह्य असल्याचा संशय व्यक्त करत, नवनिर्वाचित महापौर जयश्री सोनकांबळे यांनी या कामांना चौकशीसाठी १० दिवसांची स्थगिती दिली आहे. महापौरांच्या या निर्णयामुळे अनेक कोटींच्या कामांना ब्रेक लागला असून, संबंधित गुत्तेदारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

​भाजपचा ‘टक्केवारी’चा आरोप:

महापौरांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी भाजपचे लातूर शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर आणि मनपा विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस पक्षाला टक्केवारी हवी आहे, म्हणूनच हे वर्क ऑर्डर स्थगित करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप भाजपने यावेळी केला.

काँग्रेसचा पलटवार:

भाजपच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या वतीने १३ मार्च रोजी दुपारी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, “एकाच कामाच्या निविदेची विभागणी करून अनेक गुत्तेदारांना नियमबाह्य पद्धतीने कामे मंजूर करण्यात आली होती. ही अनियमितता थांबवण्यासाठी आणि चौकशीसाठी महापौरांनी स्थगिती दिली आहे. टक्केवारीची सवय कुणाला आहे, हे लातूरच्या जनतेला नव्याने सांगण्याची गरज नाही.”

​यावेळी उपमहापौर ॲड. स्नेहल उटगे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, गटनेता विजय साबदे, नगरसेवक दिपक सुळ, इसरार सगरे, सचिन गायकवाड, विकास कांबळे, आतिष चिकटे, प्रविण सुर्यवंशी यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

पुढील पाऊल काय?

आता महापौरांनी दिलेल्या १० दिवसांच्या या चौकशीत काय निष्पन्न होते आणि स्थगिती उठवली जाते की कामे रद्द होतात, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!