कोल्हापूर/लातूर: नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि भारतीय सारस्वत मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे आयोजित राज्यस्तरीय लेखनी मराठी साहित्य संमेलनात लातूरच्या सुपुत्री आणि कवयित्री जना घूले (नागरगोजे) यांनी आपल्या काव्यप्रतिभेने उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या ‘अनोळखी’ या कवितेच्या उत्कृष्ट सादरीकरणाबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री आदिती शारंगधर यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
साहित्य संमेलनाचा दिमाखदार सोहळा
कोल्हापूर येथील विद्याभवन, विक्रम हायस्कूल परिसरात पार पडलेल्या या संमेलनाचे अध्यक्षपद अशोक भोईटे यांनी भूषविले. यावेळी परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी डॉ. चंद्रशेखर हळिंगले होते, तर स्वागताध्यक्ष म्हणून सुरेश सरकटे यांनी धुरा सांभाळली. या सोहळ्याला नगराध्यक्षा मनीषा डांगे, अभिनेत्री आदिती शारंगधर आणि खंडेराव जगदाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
‘अनोळखी’ कवितेला दाद आणि सन्मान

लातूर तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा नांदगाव येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या जना घूले यांनी या संमेलनात निमंत्रित कवयित्री म्हणून सहभाग नोंदवला होता. त्यांनी सादर केलेल्या ‘अनोळखी’ या स्वरचित कवितेला रसिकांनी भरभरून दाद दिली. त्यांच्या सादरीकरणातील ओघवतेपणा आणि आशयघनतेमुळे त्यांची निवड विशेष सन्मानासाठी करण्यात आली.
“शिक्षण क्षेत्रासोबतच साहित्य क्षेत्रातही जना घूले यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या यशाने लातूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.”
- एलटीएन न्यूज संपादक नेताजी जाधव
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
या सोहळ्याला महाराष्ट्रभरातील विविध जिल्ह्यांतून नामवंत कवी आणि साहित्यिक उपस्थित होते. एका शिक्षिकेने राज्यस्तरीय व्यासपीठावर मिळवलेल्या या बहुमानाबद्दल शिक्षण विभाग, साहित्यिक वर्तुळ आणि नांदगाव पंचक्रोशीतून जना घूले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

