चांद्रयान तिनच्या विजयोत्सवानिमित्त लातूरात भरगच्च कार्यक्रम.
खगोल विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, शिक्षक, पालक, विद्यार्थी व जिज्ञासू नागरिकांसाठी खास निमंञण.
लातूर दि १४ सप्टेंबर चांद्रयान ३ च्या यशस्वी प्रक्षेपणाद्वारे भारताने चंद्रावर “विक्रम” उतरवून जगात पहिला नंबर मिळविला. एवढेच नव्हे तर चंद्राच्या पृष्ठभागावर “शिवशक्ती” आणि “तिरंग्याची” अमिट छाप सोडली. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासून ते आजच्या आश्चर्यकारक कामगिरीपर्यंत, जे जे शक्य आहे त्याच्या मर्यादा सातत्याने पुढे ढकलण्याचा यशस्वीपणे प्रयत्न केला आहे. त्यांच्या या अभिमानास्पद असलेल्या कार्याची माहिती समाजातील सर्वांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी लातूर शहरात “चांद्रयान-३ विजयोत्सवाचे” आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक १५ आणि १६ सप्टेंबर रोजी लातूर शहरात विविध ठिकाणी वेगवेगळे उप्रक्रम योजिले आहेत. दि १५ सप्टेंबर रोजी ‘चांद्रयान १, २ साडे माडे ३’ या पुस्तकाचे सकाळी १०.०० वा. गोदावरी लाहोटी कन्या शाळेत प्रकाशन, भारतीय खगोलशास्त्र- प्राचीन ते अर्वाचीन या विषयावर श्री मारवाडी राजस्थान विद्यालयात व्याखान, भारताची उज्ज्वल विज्ञान परंपरा यावर केवळ शिक्षकांसाठी चर्चासत्र
आणि रात्री राजा नारायणलाल लाहोटी इंग्रजी शाळेच्या मैदानावर आकाश दर्शन. तसेच दि १६ सप्टेंबर रोजी चांद्रयान-३ या विषयावर सकाळी १०.३० जनकल्याण विद्यालय, हरंगुळ येथे आणि भारतीय क्षेपणास्त्रे या विषयावर एम एस बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयात दुपारी १.३० वाजता सचित्र सादरीकरणाचे आयोजन केले आहे.

दोन दिवसीय कार्यक्रमासाठी पुणे येथील डी आर डी ओ येथील समूह संचालक (निवृत्त) आणि डॉ ए पी जे कलाम यांच्या सोबत कार्य केलेले आहे, असे प्रसिद्ध शास्त्रज्ञ काशीनाथ देवधर आणि आयुका, पुणे येथील तुषार पुरोहित उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. या सर्व कार्यक्रमात खगोल विज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ, अभियंते, शिक्षक, पालक, सर्व वयोगटातील विद्यार्थी आणि जिज्ञासू नागरिक सहभागी होऊ शकतात.
लातूर विज्ञान केंद्र, विद्याभारती देवगिरी प्रांत आणि इरा – शिक्षा शोध संसद या स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘चांद्रयान-३ विजयोत्सवा’ मध्ये सहभागी होऊन ज्ञान आणि आनंद घ्यावा असे आवाहन लातूर विज्ञान केंद्राचे सचिव डॉ अजय महाजन, विद्याभारती देवगिरी प्रांताचे उपाध्यक्ष नितीन शेटे, भा शि प्र चे संजय गुरव, विद्याभारती लातूर जिल्हा मंत्री रघुनाथ पाटील, सह मंत्री प्रवीण शिवंगीकर यांनी एका संयुक्त निवेदनात केले आहे.
