लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पीक विमा द्या - खासदार सुधाकर शृंगारे यांची कृषीराज्य मंत्र्यांकडे मागणी.लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पीक विमा द्या - खासदार सुधाकर शृंगारे यांची कृषीराज्य मंत्र्यांकडे मागणी.

लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपाचा पीक विमा द्या – खासदार सुधाकर शृंगारे यांची कृषीराज्य मंत्र्यांकडे मागणी.

पीक विम्यासाठी खासदार सुधाकर शृंगारे यांनी घेतली कृषी राज्यमंत्र्यांची भेट.

लातूर प्रतिनिधी : लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रसंगी विमा कंपनीच्या धोरणात बदल करून तातडीने पीक विमा देण्यात यावा अशी मागणी खासदार सुधाकर श्रंगारे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांना भेटून केली आहे. लातूर जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी कसे पीक विमा मिळण्यापासून वंचित राहिले आहेत याची माहितीच खासदार सुधाकर शृंगारे यांनी निवेदना द्वारे राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे दिली आहे . अतिवृष्टी आणि गोगलगायींच्या उपद्रवामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे ,तरी देखील विमा कंपनीने बहुतांश शेतकऱ्यांना विम्याची रक्कम दिलेली नाही. तांत्रिक अडचण दाखवत विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याने खासदार सुधाकर शृंगारे यांनी विमा कंपनीला सरकारने सूचना द्याव्यात अशी मागणी केली आहे .

लातूर जिल्ह्यातल्या जवळपास ८,२९,७७० शेतकऱ्यांनी ५,६६,०२५ हेक्टरवर लागवड केलेल्या सोयाबीन आणि इतर पिकांचा विमा उतरविला होता. त्यामुळे केंद्र सरकार , राज्य सरकार आणि शेतकऱ्यांचा वाटा धरून लातूर जिल्ह्यासाठी ४४२.७१ कोटी रुपये प्रिमियम जमा करण्यात आला होता. जिल्ह्यातल्या ८,२९,७७० शेतकऱ्यांपैकी केवळ २,११,४१४ शेतकऱ्यांना १४९. कोटींचा पीक विमा खरीप हंगामासाठी म्हणून वाटप करण्यात आला आहे . त्यामुळे अनेक शेतकरी अडचणीत आले आहेत . अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . तर त्यानंतर गोगलगायींनी पिके फस्त केल्याने शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलेले नाही. अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही हाती काहीच लागलेले नाही. त्यामुळे खरीप हंगामातील नुकसानीचा विमा मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे . यासाठी अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते आंदोलने देखील करीत आहेत. मात्र पीक विमा कंपनी तांत्रिक अडचण आणि नियमांना सांगत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाऊले उचलताना दिसत नाही. पीक विमा कंपनीचा कारभार हा पारदर्शक नसल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. शेतकऱ्यांची अवस्था लक्षात घेऊन खासदार सुधाकर शृंगारे यांनी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची भेट घेतली ,या भेटी दरम्यान त्यांनी लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या धोरणात प्रसंगी बदल करून विम्याची रक्कम तातडीने उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यातल्या ६० पैकी ४० महसुल मंडळात अतिवृष्टीने नुकसान झालेले आहे. जवळपास सहा लाख शेतकरी खरिपाच्या पीक विम्या पासून वंचित राहिलेले आहेत. पीक विमा कंपनीने २०२०,२०२१ आणि २०२२ असे सलग तीन वर्षांत विमा वाटपात चुका केल्या आहेत. त्यामुळे २०२३ च्या हंगामासाठी जिल्हा स्तरावर विशेष समिती स्थापन करण्यात यावी अशी मागणीही खासदार सुधाकर शृंगारे यांनी कृषी राज्यमंत्र्यांकडे केली आहे . जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा लवकरात लवकर मिळावा यासाठी खासदार सुधाकर शृंगारे आग्रही झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page

error: Content is protected !!